HOME PAGE
श्री दत्त भजन मंडळ जबलपूर एक संक्षिप्त परिचय
|| श्री गुरुदेव दत्त ||
आणिक सांगेन एक खुण | गायनी करावे स्मरण | त्यांचे घरी मी असें जाण |
गायनी प्रीती बहु मज | नित्य जे जण गायन करिती | त्यांवरी माझी
अति प्रीती | ह्यांच्या घरी अखंडिती आपण असें अवधारा ||
-श्री शरद आठले, सचिव, श्री द.भ.मं.
श्री गुरुचरीत्रातील ह्या ओवींना प्रेरित होऊन जबलपूरच्या दत्त भक्तांनी आरंभी मित्रांच्या घरी आळीपाळीने होणाऱ्या गुरुवारच्या श्री दत्त भजनाने सुरुवात करून मे १९३२ मध्ये श्री दत्त मंडळ हि संस्था स्थापित केली. क्रमाक्रमाने प्रगती करत संस्था आपल्या स्थापनेचा अमृत महोत्सवाचा टप्पा ओलांडून पुढे वाटचाल करत आहे. १९३२ सालचा तो काळ व आजचा काळ ह्या मध्ये फारफार बदल झालेला आहे. १९३२ सालात दुसऱ्या महायुद्धाची सावट पसरलेली होती. विजेची टंचाई, मनोरंजनाच्या साधनांचा अभाव, जबलपूरात महाराष्ट्रीयन जनसंख्येची कमी ह्या सर्व कारणांनी महाराष्ट्रीयन समाजाला एकजूट करण्यास ईश्वर भक्ती हाच एक मार्ग होता. भजनाच्या माध्यमातून एकत्र येऊन सामाजिक समस्या कशा सोडविता येतील, समाजाचा सर्व घटकांमध्ये परस्पर आपुलकी कशी निर्माण करता येईल हाच ध्यास त्यावेळचा संस्थापक मंडळाच्या सदस्यांच्या मनामधे घोळत असावा आणि म्हणूनच ईश्वर भक्तीला माध्यम ठेऊन ही धार्मिक संस्था समाज कार्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता सतत ८० पेक्षा अधिक वर्षापासून कार्य करीत आहे. कोणतीही संस्था आवश्यकतेच्या तळमळीतूनच उभी राहते, तिची जोपासना करण्याकरिता कार्यकर्त्यांचे निस्वार्थ परिश्रम लागतात, ह्या परिश्रमांना योग्य दिशा देण्याकरता सशक्त नेतृत्व लागते व सर्वात आवश्यक म्हणजे चांगला उद्देश्य लागतो. समाजाच्या कल्याणाकरिता, हित करता एक पाऊल उचलले गेले तर त्याला साथ देण्याकरिता १०,२० पावले आपोआप उचलली जातात हाच आमचा मराठी लोकांचा स्वभाव व अनुभव आहे. आमच्या संस्थेत उत्साही कार्यकर्त्यांचा, मुत्सद्दी नेतृत्वाचा कधीच अभाव भासला नाही आणि म्हणून १९३२ साली शून्यातून निर्माण झालेली ही संस्था आज आपल्या कलात्मक मंदिरासह, भव्य वास्तूसह समाज सेवा करीत आहे ही केवळ संस्थेच्या कार्यकर्त्यांना, सदस्यांनाच अभिमानाची गोष्ट नाही तर जबलपूरच्या संपूर्ण मराठी समाजाला अभिमानाची गोष्ट आहे.
१९३२ साली संस्थेची स्थापना पूसटकरांच्या वाड्यात झाली. आता ते नाव मंडळाचा इतिहास म्हणूनच लक्षात ठेवण्यासारखे आहे. १९३३ साली मंडळाचे स्थान परिवर्तन होऊन श्री दत्तात्रेय रामचंद्र वैद्य यांचा घरात आले. वर्ष १९४१ मध्ये परत स्थान परिवर्तन होऊन मंडळाचे एक संस्थापक सदस्य कै. पांडुरंग विष्णू फाटक ह्यांच्या स्वत:च्या गढाफाटक येथील घरातील प्रशस्त दिवाणखान्यात स्थापना झाली. मंडळाची आपली स्वत:ची जागा असावी ह्या विचाराने गोल बाजार येथील जवळ जवळ १.५० एकड जागा मंडळाने विकत घेतली व तेथे मंदिराच्या प्रथम चरणान्तर्गत १२ फुट- ५० फुट जागेत एक लाकडाच्या फळ्यांनी झोपडी बांधण्यात आली.
ह्याच जागेत श्री दत्त मंदिराच्या इमारतीची वास्तुशांत 3 डिसेंबर १९५१ मध्ये करण्यात येऊन १० जून १९५७ मघे श्री दत्त मूर्तीची स्थापना पं. प्रग्यानंद सरस्वती ह्यांनी आचार्य पद स्वीकारून करवली. मंडळाच्या आजच्या भव्य स्वरूपास अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे परिश्रम, समर्पण व सोसलेली आर्थिक झीज ह्यांची मदत झाली आहे. “भक्तांच्या हृदयातील भावांचे प्रतिबिंब सगुण मूर्तीचे दिसते” असें म्हणतात. खरोखरच स्थापित श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीतील प्रेमळ भाव व आकर्षक चेहरा दर्शनास येणाऱ्या भक्तांना आजही मोहित करतो. श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती स्थापनेला जवळ जवळ ६० वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या मोठ्या कालखंडात मंडळा पुढे अनेक अडचणी आल्यात परंतु कार्यकर्त्यांच्या चिकाटीमुळे व मंडळास लाभलेल्या अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीच्या सशक्त नेतृत्वामुळे ह्या साऱ्या अडचणीतून मार्ग काढता आला.
ह्या दीर्घ कालखंडात कै. स. ल. उपाख्य बाबसाहेब परांजपे यांची भक्तिभावाने केलेली योजकता, कल्पकता व कार्यकुशलता हि वाखाणण्या सारखी, अविस्मरणीय व येणाऱ्या पिढीला आदर्श ठरणारी आहे. वयाच्या ९९ वर्षापर्यंत त्यांनी मंडळाची अविरत सेवा केली. सतत ५५ वर्ष सचिवाच्या पदावर राहून मंडळाच्या उन्नतीच्या सतत ध्यास घेऊन सतत चिंतन, मनन करून मंडळाला आजच्या स्थितीत आणण्याकरिता अविस्मरणीय योगदान दिले आहे. संस्था ह्याबद्दल त्यांची सदैव ऋणी राहील.
संस्थेचे श्री दत्त मंदिर हे केवळ जबलपूरातील नव्हे तर संपूर्ण प्रांतात एक धार्मिक प्रचार केंद्र व्हावे व त्या योगे समस्त महाराष्ट्रीयन समाजाने सांस्कृतिक केंद्र होऊन सामाजिक कार्य करत समाजाची उन्नती करावी हेच ध्येय मंडळाने जोपासले आहे.संस्था चालवितांना तिच्या आर्थिक सुदृढतेचा तात्कालिक व दूरगामी विचार अपरिहार्य ठरतो. विकासाचा वेग निरंतर ठेवण्यासाठी निरनिराळ्या योजना राबवाव्या लागतात. त्यांत कल्पकता आणि प्रामाणिक प्रयत्न यांची सांगड घातल्यास यश सुनिश्चित असते.
मूळ उद्देशांना धरूनच धोरण ठेवावे लागते. संस्थेचे चालणारे धार्मिक व उत्सव कार्यक्रम तसेच संस्थेला आर्थिक सदृढता देण्याकरिता खालील कार्यक्रम केले जाता.